Archive

Archive for 11/12/2009

अश्शी नाती !

11/12/2009 8 comments



हो परवा म्हणजे नउ डिसेंबर ला मी दिप्ती च्या गृहमुखाला औरंगाबाद येथे गेलो होतो. कोण ही दीप्ती ? …. तो एक मोठ्ठा किस्साच आहे ….एखाद्या सिनेमात शोभावा अस्सा !

तेव्हा मी नोकरीत होतो. त्या वर्षीचा एल.टी.सी. संपवायचा होता. रजाच मिळत नव्हती. अगदि शेवटच्या क्षणी ती मंजूर झाली. मी रिझर्वेशन साठी स्टेशन वर गेलो. त्यात नाताळची सुटी आणि इतका उशीर झालेला … बंगलोर मनात असूनही नाईलाज होता. फक्त सिकंदराबादचे रिझर्वेशन चालू होते. पण विचार करण्यात वेळ घालवला असता तर ……तर पुन्हा नकार घंटाच ऐकायला मिळाली असती … क्षणाचाही विलंब न करता आमची चार तिकीटे मी आरक्षित केली. घरी येऊन सांगीतले तर सारे जण नाराज ! ( तेव्हा जे बंगलोर जमले नाही ते नंतर जांवयाने त्यांच्या कार मधून नेऊन आणवले !) हे ठिकाण विशेष नावाजलेले, माहीतीचे नव्हते.  सहसा ठीकाण  माहीततले  असल्या शिवाय ट्रीप साठी कोणी जात नाहीत,…. पण नाईलाज असल्याने … केले मान्य एकदाचे सर्वांनी ! आणि   १९७८-७९ चा एल. टी.सी घेऊन आम्ही एकदाचे सिकंदराबादला पहाटे पहाटे पोहोचलो ! सूर्योदय होऊ पहात होता. गाडी संथ वेगाने स्टेशनात पोचली. आम्हालाही घाई अशी नव्हती. नव्या गावाची माहीतीही नव्हती ! हमालावर भिस्त ठेवून एखाद्या चांगल्या हॉटेलात नेण्याची व्यवस्था करण्यास विनवले. त्यानेही इमानेइतबारे स्टेशनच्या बाहेरील एक दोन हॉटेल्स दाखविलीत व एका मध्ये आम्ही  रूमवासी झालोत. सकाळची आन्हीके उरकलीत, नास्ता जेवण झाले थोडीशी विश्रांतीही झाली.

नंतर मग नकाशा उघडला, चारमीनारला जायला डायरेक्ट बस आहे असे कळले. थोडेसे शोधून बस मधे  बसलो. जातांना वाटेत बिर्ला मंदीर लागते असे सहप्रवाश्यांनी सांगून त्याचे छान आहे म्हणून वर्णन केले.  तेव्हा उतरलो व ते बघीतले. पूर्ण संगमवरातील मंदीर ही अलिकडल्या काळातील एक अजोड कलाकृती आहे. मूर्तीही अत्यंत सुंदर आहेत. एकूण स्वच्छ परिसर बघून प्रसन्न वाटले. परत बस स्टॉप वर आलॊ. दुसरी बस करीत चारमीनारला आलो…. वेगवेगळी तिकीटे काढली असती तर पैसे वाचले नसते का?… वगैरे बायकी टोमणे मारून झालेत !! पण आधी हे ठीकाण माहीत असते तर तसेच केले नसते का … वगैरे सामोपचाराच्या गोष्टी होत चारमीनार आले. अर्थात मुसलमानी आर्कीटेक्चर चे कौतुक झाले ! मला मात्र ते कधीच पटलेले नाही ! कै. पु. ना. ओकांनी कितीही कंठशोष करून पुरावे देऊन सांगून ही लोकांना ते पटतच नाही त्याला काय करणार. त्यांनी तर स्वच्छच सांगीतलेल्रे आहे. अगदी ताजमहाला सकट  मुसलमानांनी  येथे येऊन नवीन काहीही बांधले नाही, केली ती फक्त तोडाफोडी, लुटालूट, बायका पळविणे आणि हिंदूंची मानहानी होईल असे सर्व काही. अर्थात सरकार दरबारी ते मान्य पावण्याची सुतराम शक्यता नाही… जाऊंदे तो राजकारणाचा विषय आहे  व आत्ता तो इथे अप्रस्तुत आहे !

चारमीनार बघीतला बाजूचे बाजार पाहीलेत, किरकोळ खरेदी, खादाडी झाली आणि आल्या मार्गाने परत जाण्यासाठी बस मध्ये बसलो. बसने परतीचा मार्ग आक्रमायला सुरूवात केली. आमच्या आपसात गप्पा चालू होत्या. आजुबाजुचे तेलगुत बोलत होते. आम्ही चौघेच मराठीतून बोलत होतो. काही अंतर गेल्यावर आमच्या मागेच उभा असलेला एक कॉलेज तरूण मुलगा अस्खलित मराठीत आम्हाला विचारू लागला…. तुम्ही मराठी का ? कोणत्या गावाहून आलात वगैरे चौकश्या सुरू झाल्यात. त्याने स्वत:चीही माहीती सांगायला सुरूवात केली….अरूण नाव होते त्याचे…तो मराठीच पण अनेक वर्षे इथे काढली आहेत …मग त्याचा व्यवसाय रहाता कुठे ह्या माहीतीची देवाणघेवाण झाली ! तो आम्हाला लॉज पर्यंत सोडायला आला. सुलतान बाजारात हिरवी मशीद आहे त्याचे मागे रहात होता व उद्या रिक्षाने घरी यायचे आमंत्रण देऊन तो त्याचे घरी परतला.

मग आमच्यात गप्पा सुरू झाल्या… एव्हढी माहीती कशाला दिलीत … कोण कुठला माहीत नाही आपल्याला. शंका तर माझेही मनात होती…. उद्या जायचेच का त्याचे घरी?  इ, इ,….  तो उद्या फोन करणार होता तेव्हा उद्या फोन आलाच तर बघुया जायचे  का नाही ते ….अशी समजूत घालीत , विषय कसातरी संपवला. दुसरे दिवशी त्याचा फोन आलाच ! येण्या बाबतच्या सुचना पुन्हा देऊन झाल्यात तेव्हा आम्ही जायचे निश्चित केले ! मग त्याने सांगीतल्या प्रमाणे रीक्षावाल्यास पत्ता  सांगून बसलॊ. अंतर थोडे जास्त होते पण रीक्षावाल्याने बरोबर आणले. अरूण ही स्वागताला हजर होताच.

आम्हाला घेऊन तो घरी घेऊन आला. हिरव्या मशीदीला अगदी खेटून एक बोळ आहे तेथून आत गेल्या गेल्या शेजारचाच वाडा त्याचा होता !  दोघांमध्ये मधली भिंतच कॉमन !  वाड्यात मात्र सर्व बिऱ्हाडे मराठी बोलणारांची त्यामुळे पुण्यातल्याच एखाद्या वाड्यात शिरल्याचा भास झाला. घरात सगळ्य़ांच्या ओळखी – भेटी झाल्या ! घरी रीटायर्ड वडील होते,सगळे मामा म्हणत त्यांना , आई, आत्या म्हणून म्हणतात सारे त्यांना, बहीणीने माहीती पुरवली, मोठा भाऊ दादा, वहिनी ह्यांचे नुकतेच लग्न झालेले ! दोन बहीणी ,दुसरी इंटर स्टेट खोखो का कबड्डी खेळणारी म्हणून कुठेल्याश्या टुर्नामेंटस साठी बाहेरगावी गेलेली होती. अजून एक भाऊ आहे तो नोकरी निमित्त मुंबईत असतो. त्या बहीणीशी वंदना, आमच्या मुलींची ओळख व्हायला वेळ लागला नाही….. आत्यांनी माझ्या मुलींना जवळ येण्या साठी हांक मारली आणि ,”बसा भेंडीची भाजी आवडते का तुम्हाला ? ” लगेच पोटातच शिरल्या ! मुलींना तर काय भेंडीची भाजी आजही जीव की प्राण , धाकटी तर सात-आठ वर्षांची, अमिता चार वर्षाने मोठी बसल्या की फतकलं मारून ! आत्या एकदम जवळची झाली त्यांची !!

तेथून पुढे वंदना झाली मावशी,  दादा ,अरूण झालेत मामा, अजून एक मुंबईचा भाऊ प्रकाश त्याची जरा नंतर ओळख झाली तो बनला मुलींचा ’ परकर मामा ’. एक अख्खे कुटुंब दुसऱ्या शी जोडले जात होते ! पुढे वंदनाचे लग्न तिचा भाउ प्रकाश व आम्ही जमवले ह्याचाही एक  अनामिक आनंद मिळाला. वंदना पुण्यात रहायला आली. दोन कुटुंबातली येणी जाणी वाढलीत. धाकटी बहीण कल्पना  तिचेही  लग्न पुण्यात केले. दोन्ही भावाच्या लग्नाला आम्ही हैदराबादला गेलेलो होतो. अजून एक पुढला एल. टी. सी. हैदराबादलाच घेतला गेला !! एव्हढेच काय माझ्या सासू-सासऱ्यांनाही हैदराबादची सहल करवून आणली.

हे मी एक दोन प्यारात वर्णिले आहे पण त्या मागे गेल्या तीस वर्षांचा इतीहास आहे. मामा आता आमच्यात नाहीत. आत्या वय पंच्यायशी पण अजूनही  सगळीकडे  चौफेर लक्ष आहे ! सगळ्यांची लग्ने झालीत त्यांची मुले मोठाली झालीत. आता ही दिप्ती म्हणजे म्हणजे त्या  वंदनाचीच मुलगी ! तिचे लग्न ही लवकरच पुण्यात व्हायचे आहे. एक मोठ्ठा घरगुती सोहळा पार पडला ! तिच्या गृहमुखाला परवा आम्ही सर्व जण जमलो होतॊ !

मला वाटते ही नाती आधीचीच जुळलेली असावीत देवाच्या दरबारी ! आता पहा ना, तन्वी शी असेच एक नाते इंटरनेट मुळे जुळून आले !





Follow

Get every new post delivered to your Inbox.